

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” हे भारत सरकारचे महत्त्वाचे अभियान असून याचा उद्देश मुलींच्या जन्माचे प्रमाण ( लिंग गुणोत्तर ) सुधारणे, त्यांना समान दर्जा मिळवून देणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. ही योजना विशेषतः त्या जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे राबविली जाते, जिथे मुलींचा जन्मदर अपेक्षेपेक्षा कमी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत समाजात मुलींबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम आणि कृतीशील कार्यक्रम राबविले जातात.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत, अंगणवाडी सेविकेमार्फत बालकांना आरोग्य सेवा, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षण दिले जाते. या सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आदर्श अंगणवाडी केंद्रांची निर्मिती केली जाते. आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी, स्वच्छ व सुरक्षित वातावरणात शिक्षण आणि पोषण मिळते. यासोबतच, किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
महाराष्ट्र शासनाने “माझी कन्या भाग्यश्री” (सुधारीत) या योजनेला अधिक्रमित करून, १ एप्रिल २०२३ पासून “लेक लाडकी” योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींसाठी लागू असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा जास्त नसावे.
महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनुसार, पहिल्या प्रसूतीवेळी नवजात बालकासाठी आणि मातेसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश असलेला ₹2000 किंमतीचा “बेबी केअर किट” मोफत देण्यात येतो.
या योजनेचा उद्देश शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देणे, माता व बालकाच्या आरोग्याची काळजी घेणे आणि बाल मृत्यू दर कमी करणे हा आहे.
| वर्ष | मुले | मुली | एकूण संख्या |
|---|---|---|---|
| 2023-2024 | 36 | 41 | 77 |
| 2024-2025 | 30 | 33 | 63 |
| 2025-2026 | 25 | 29 | 54 |
केसलवाडा/पवार ग्रामपंचायत ही "स्मार्ट ग्रामपंचायत, डिजिटल ग्रामपंचायत" या दृष्टिकोनातून कार्यरत असून, पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक उपक्रम, आणि सर्वांगीण ग्रामीण विकास हे आमचे ध्येय आहे. "सशक्त ग्राम, सक्षम प्रशासन" हे ध्येय ठेवून गावाचे स्मार्ट व्हिलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.